जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटी इथं आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यांनी आज आपल्या दौऱ्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची माहिती दिली. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथून दौऱ्याला सुरुवात करणार असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हा दौरा असणार आहे.
मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्याला अंतरवाली सराटी इथून करणार आहे. 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत दौऱा असेल. मराठा समाजासोबत संवाद साधण्यासाठी हा दौरा करणार आहे. यादरम्यान ते मराठा समाजाची भेट घेणार, त्याचं म्हणणं ऐकूण घेणार आहे.मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं असून आता आत्महत्या करायच्या नाही. मी समाजाच्या भेटीला जाणार आहे असे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावरून नेते मंडळी सर्वांना घुमवत असल्याचा आरोपदेखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता असंही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. ते म्हणाले काम सुरु आहे. अंबडला समितीची बैठक लावण्याची विनंती केली मात्र अद्याप त्याचे उत्तर आले नाही. आम्ही फक्त एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेणार असून मेळाव्याला किती लोक येतील हे सांगता येणार नाही. लाखोंच्या संख्येत मराठा लोक येतील. तसंच हा कार्यक्रम शंभर एकर परिसरात होणार आहे. गैरसोय होऊ नये म्हणून तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.