नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आरक्षण समर्थकांनी हिंसक पवित्रा घेतला आहे. याच हिंसक आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. ठिकठिकाणी मोर्चे, जाळपोळ केली जात आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले. कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली. तसेच बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या जाळण्यात आल्या आहेत.
सुप्रिया सुळेंकडून फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युर असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ‘महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण एका सिटिंग आमदाराच्या घरात जाळपोळ झाली आहे. माजलगावच्या पंचायत समितीची बिल्डिंग आहे तिथे जाळपोळ सुरू आहे. हे पूर्णपणे इंटेलिजन्सचं अपयश आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्याचं अपयश आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.