जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज संपली आहे. मात्र आरक्षण काही मिळालेलं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबरला जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जर आरक्षण मिळालं नाही तर 25 ऑक्टोबरपासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार आजपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता राज्य सरकार जरांगे पाटलांच्या मागणीबाबत काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्यातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत शंकादेखील व्यक्त केली.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कुणीतरी रोखतंय, असा दावा जरांगे यांनी केला आहे. ‘अडचण असल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काहीतरी हाय. नाहीतर त्यांनी शपथ घेतली नसती. काहीतरी आत शिजतंय, त्यांनी 40 दिवस घेतलेच नसते. मी शब्द देऊन सांगतो काहीतरी आजत शिजतंय, हे 100 टक्के आहे. कुणीतरी आड येतंय. आम्ही जवळपास त्याचा शोध घेतलाय, थोडा वेळ थांबा, सगळं समोर येईल’, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच ‘पंतप्रधान मोदींना गरीबांचा कळवळा आहे, पण आता मला शंका यायला लागली आहे. काहीतरी आत शिजतंय, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली नसती’, असाही दावा जरांगे यांनी केला आहे.