मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील सभेत मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) व मराठा समाजाबद्दल एक अक्षरही काढले नाही. यावरून जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. म्हणजे मोदींना गरीबांची चिंता नसल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी करताच राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाचामुद्दा तापला असून मराठा बांधवांकडून राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जात आहे. तसेच नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
राज्यभर मराठा समाजाकडून आंदोलने केली जात असताना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. तसे पत्र मराठा समाजाच्या वतीने मंदिर समितीला देण्यात आले आहे. पुढील महिन्यात कार्तिकी एकादशीची विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येते. 23 नोव्हेंबरला ही महापूजा होणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने पुजेचा मान नेमका कोणाला? असा पेच उभा राहिला असतानाच मराठा समाजाने महापुजेला येणाऱ्या मंत्र्यांना विरोध दर्शवला आहे.
मराठा समाजाने दिला इशारा
मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आला आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या कार्तिकीमहापूजेला येताना उप-मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच यावे, अन्यथा जे मंत्री,उपमुख्यमंत्री महापूजेला येथील त्यांच्या तोंडाला काळे फासू..” असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच ही कार्तिकी एकादशीची महापुजा कोणत्याही नेत्यांच्या हस्ते न करता वारकऱ्यांच्या हस्ते करावी.. अशी मागणीदेखील मराठा समाजाकडून करण्यात आली आहे.