मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान परिषदेमध्ये मदतीची घोषणा केली आहे. सरकार सगळ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी दिले. या घोषणेनुसार पुरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुकानांचं नुकसान झालं असेल तर 50 हजार रुपये आणि टपरीचं नुकसान झालं असेल तर 10 हजार रुपये देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले आहे.
याबरोबर पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देण्यात येणार आहे, तसंच दुबार पेरणीकरता बियाणंही उपलब्ध होतील, शेतकरी अडचणीत येणार नाही. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी विधिमंडळात दिली. तसंच आपण एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत केली आहे. पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले असतील तर बांधकाम विभाग रस्ते दुरूस्त करतील, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
‘चंद्रपुरात मोठं नुकसान झालं आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री घटनास्थळी गेल्यानंतर कामाला वेग आलेला पाहायला मिळाला. सर्व जिल्हाधकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आदेश दिले जातील, सरकार कुणालाही निधीची कमतरता भासू देणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनडीआरएफच्या मदतीपेक्षा जास्त मदत दिली आहे. सरकार सर्वांना मदत करेल,’ असे अजित पवार (Ajit Pawar) विधान परिषदेमध्ये म्हणाले आहेत.