कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या (Ambabai Mandir) भिंतीला खेटून असलेली चप्पल स्टँड आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्यात आल्यानंतर आज मोठा राडा झाला. पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर खासगी दुकानदार आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने आज कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याला खासगी दुकानदारांनी विशेषत: महिलांनी जोरदार विरोध केला. करवीर निवासी अंबाबाई मंदिराची भिंत आहे. त्या भिंतीला लागूनच हे खासगी चप्पल स्टँड आहे. हे चप्पल स्टँड काढण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.
खासगी दुकानदारांचा विरोध का?
आम्ही गेल्या 20-25 वर्षांपासून इथे चप्पल स्टँड लावत आहोत, हे चप्पलस्टँड हटवलं तर आम्ही करायचं काय असं या दुकानदारांचं म्हणणं आहे. या कारवाईविरोधात आम्हाला कोणतेही नोटीस देण्यात आले नाही. आम्हाला सरकारने न्याय द्यावा. आमचं 15-20 जणांचं चप्पलस्टँड आहे, हे सर्व प्रकरण कोर्टात आहे, तरीही मनपाने कारवाईला सुरुवात केली आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे.