जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. येत्या 24 ऑक्टोबरला ही मुदत पूर्ण होत आहे. आपण आरक्षणाबाबतची आपली पुढील भूमिका 22 ऑक्टोबरला स्पष्ट करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
सरकारने येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 25 तारखेपासून जे उपोषण सुरू होईल, तेव्हा कोणतेही वैद्यकीय उपचार घेतले जाणार नाहीत, तसेच पाणी सुद्धा पिणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मराठी समाजाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहिल. त्यावेळी गावात एकाही राजकीय नेत्याला एन्ट्री मिळणार नाही असेदेखील ते म्हणाले.
तसेच पुढे बोतलाना जरांगे पाटील म्हणाले की, प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषणं सर्व गावांच्यावतीने 25 तारखेपासून एकाच ठिकाणी ताकदीने सुरू केली जातील. 28 पासून त्याच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी एकत्र येऊन कायमस्वरुपी बसून रहायचं. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचे. हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला झेपणार नाही.25 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा सांगणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.