जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच सरकारला वेळ दिला तरी माझे आंदोलन थांबणार नाही. मी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. आतपर्यंत आपण 40 वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा आरक्षण आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेया मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान, या बैठकीचा मसुदा मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘सर्वपक्षीय बैठकीत सरकराने दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. तसेच गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पण आरक्षणाचं काय?, कालच्या बैठकीत सरकारनं आरक्षणावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरसकट आरक्षणाचा पत्र जेव्हापर्यंत माझ्या हातात आणि शेवटच्या मराठाच्या हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच उपोषण सोडताना मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी यावे अशी मनोज जरांगे पाटील यांनी अटदेखील घातली.