मुंबई : इर्शाळवाडीच्या दरड कोसळण्याच्या (Irshalwadi Landslide) दुर्घटनेनंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील (Irshalwadi Landslide) नागरिकांचे स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, अजूनही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी इर्शाळवाडीमध्ये जाऊन भेट दिली, त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये निवेदन देताना ही घोषणा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केले आहेत.
एवढ्या उंचावर साहित्य, साधनासामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असल्याची ग्वाही दिली. मात्र यंत्रणा, साधने असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही, याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.इरशाळ गडाच्या पायथ्याशी (Irshalwadi Landslide) वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी 60 कंटेनर मागवण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.