सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील 23 हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील 8 ते 10 हजार शिक्षकांची (Teacher Recruitment) भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवर सध्या नावनोंदणी सुरु असून आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसे संमतिपत्र द्यावे लागणार आहे.
राज्यात जिल्हा परिषदांच्या 70 हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये 65 ते 68 लाख विद्यार्थी आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत अंदाजे 28 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांमध्येही 30 हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. 2019 नंतर शिक्षक भरती झालेली नाही, दुसरीकडे कोरोनामुळे शासकीय पदभरतीवर निर्बंध होते. डी.एड, बी.एडनंतर टेट, टीईटी उत्तीर्ण होऊनही चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लवकरच शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ‘पवित्र’ पोर्टलद्वारे सर्वच शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्याने ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आल्या आहेत.ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकणसह इतर विभागांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
शिक्षक भरतीची स्थिती
शासकीय शाळांमधील पदे – 23,000
‘खासगी अनुदानित’मधील पदे – 8 ते 10 हजार
एकूण शिक्षक भरती – 33,000
भरतीचा कालावधी – 3 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर