‘कमळ’ फुललं, ‘झाडू’ फिरला, सायकल ‘पंक्चर’, हात’ मोडला…(संपादकीय)

701 0

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा भाजपाची कमळं फुलली तर पंजाबमध्ये ‘आप’चा झाडू फिरला. विशेष म्हणजे या पाचही राज्यांतील एकूण 690 जागांपैकी 635 ठिकाणी काँग्रेसचा हात मोडला. उत्तर प्रदेशात सपाची सायकल पुन्हा एकदा ‘पंक्चर’ झाली, बसपाचा ‘हत्ती’ गाळात रुतला तर शिवसेना-राष्ट्रवादीवर उत्तर प्रदेश-गोव्यात डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली.

भाजपाची चार बोटं तुपात…

पाच राज्यांतील एकूण 690 जागांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 356 ठिकाणी कमळं फुलवत भाजपानं जबरदस्त कामगिरी केलीये. एक पंजाब वगळता भाजपाची चारही बोटं तुपात आहेत. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढं जातो, असं मानलं जातं. याचाच संदर्भ देत उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. उत्तर प्रदेशातील 2017 च्या विधानसभा निकालानं 2019 मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता आणि आता 2022 च्या निकालानं 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केलंय. 2024 ची सार्वत्रिकनिवडणूक जिंकल्यास भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल, हे आता स्पष्ट दिसू लागलंय.

‘आप’ कमाई…

दिल्ली दोनदा सर केल्यानंतर ‘आप’नं पंजाबचा गडही जिंकला आणि ‘हम भी है रेस मैं’ असं म्हणत भविष्यात साऱ्या देशात झाडू फिरवू, असा गर्भित इशारा दिला. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू त्रिफळाचीत, चरणजीतसिंग चन्नी दोन्ही मैदानात पराभूततर प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदरसिंग यांसारख्या दिग्गजांना धूळ चारत ‘आप’नं बाजी मारली. 117 पैकी तब्बल 92 जागांची ‘झाडू’न सफाई करत ‘आप’ कमाई दाखवून दिली.

काँग्रेसचं ‘हात’ दाखवून अवलक्षण…

‘आप’नं काँग्रेसच्या ‘हाता’तील पंजाबही हिसकावून घेतल्यानं देशातील 28 घटक राज्यांपैकी काँग्रेस आता केवळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व पुड्डुचेरी या 05 राज्यांपुरती नावाला उरलीये. ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसनं तर काँग्रेसला आपल्या पक्षात विलीन होण्याची ऑफर देत हिणवलं आहे तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी, ‘काँग्रेसला आपलं नशीब बदलण्याची इच्छा असेल तर आता ते बदल टाळू शकत नाहीत,’ असं म्हणत थेट नेतृत्व बदलाबाबत भाष्य केलंय.

शिवसेना-राष्ट्रवादीबद्दल न बोललेलंच बरं !

उत्तर प्रदेशात सपाच्या सायकलवर बसलेली राष्ट्रवादी सायकलच ‘पंक्चर’ झाल्यानं तोंडावर आपटली तर स्वबळावर लढताना शिवसेनेनं सोडलेले बाण निशाणा साधण्याआधीच मोडून पडले.
गोव्यात तर सेना-राष्ट्रवादीला डिपॉझिटही टिकवता आलं नाही. त्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादीच्या ‘अतुलनीय’ कामगिरीबद्दल न बोललेलंच बरं !

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

हसन मुश्रीफांच्या घरी तिसऱ्यांदा इडीची छापेमारी; “एकदाच गोळ्या घालून जा…!” मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना झाल्या अनावर

Posted by - March 11, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दोन महिन्यांमध्ये आज तिसऱ्यांदा ईडीने छापा…
Nashik crime

Nashik Crime : मुलीचं गावातील तरुणाशी लफडं असल्याचे समजल्यावर कुटुंबीयांनी घरी बोलवून बेदम तुडवलं, अन्…

Posted by - August 22, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nashik Crime) प्रतीक…
Mumbai News

Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : परिचारिका संवर्ग हा अत्यंत सेवाभावी वृत्तीने सेवा देणारा, बहुतांश महिला कर्मचारी असलेला संवर्ग असून सन, उत्सव बाजूला ठेवून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *