गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभावामुळे आजही अनेकांचे नाहक बळी जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गडचिरोलीमधून (Gadchiroli News) समोर आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याचा मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन गावात नेण्यात आला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भामरागड (Gadchiroli News) तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील गणेश लामी या 23 वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्याला 17 जुलै रोजी गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृत गणेशचे शव दुचाकीवर खाटेला बांधून त्याच्या गावी नेण्यात आले. या सगळ्या प्रकारामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हा सगळा प्रकार लक्षात येताच खळबडून जागं झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मृतदेह गावात पोहोचला होता. यानंतर या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले आहे. देशात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम चालवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे, यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील हा प्रकार पाहून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.