मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. कमी झालेलं प्रवासी भारमान आणि टोलचा भार असा दुहेरी फटका बसत असल्यानं एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला. या मार्गावरून आता फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहेत.
एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्यानं त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत होता. प्रवासी भारमान कमी होणं आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्यानं जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी भारमान घटल्याचं सांगितलं गेलं. एसटी महामंडळानं काही दिवसांपूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार, आता एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. याआधी देखील, एसटीच्या साध्या बसेस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होत्या मात्र काही चालक परस्पर एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळानं हा निर्णय घेतला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेंगळुरू, मंगलोर मार्गाकडं जाणाऱ्या सर्व एसटी बसेस आता जुन्या मुंबई-पुणे मार्गे धावणार आहेत.
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर एका बसला जाता-येता 485 रुपये टोल द्यावा लागतो तर नवीन एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी त्याच बसला जाता-येता 675 टोल द्यावा लागतो. त्यामुळं एका बसमागं एका फेरीमागं 190 रुपयांचा भुर्दंड पडत होता. शिवाय नवीन एक्सप्रेसवे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी भारमान अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळं आता एसटी महामंडळानं एक्स्प्रेस वेवरून एसटी बस चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.