औरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता शहराच्या पुंडलिकनगर भागात राहत्या घरात पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कधी झाली असावी हे अजून स्पष्ट झाले नाही. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह उत्तर तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
हिरालाल कलंत्री ( 55 ) आणि किरण शामसुंदर कलंत्री (45) अशी मृतांची नावे आहेत.
आज सोमवारी सकाळी कलंत्री यांच्या घरामधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पुंडलीकनगर पोलिसांना याची माहिती दिली. या परिसरातील गल्ली नंबर 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी घटनसथळी जाऊन पाहणी केली असता, पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. हा खून अत्यंत नियोजनपूर्वक केल्याचंही दिसून येत आहे. खुनानंतर दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर ठेवले होते. पलंगाखाली हे मृतदेह ठेवल्यामुळे काही काळ फारसं कुणाला कळलं नाही. मात्र मृतदेह कुजल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. कलंत्री दांपत्याचा मुलगा गायब असून त्याचा देखील फोन लागत नसल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे.
औरंगाबादमध्ये गुन्हेगारी वाढली
शनिवारी दुपारी देवगिरी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या आधी दोन दिवसांपूर्वी एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. तसेज जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि वाद झाले. यातून एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्याला गंभीर जखमी केले. यात एकाचा मृत्यू झाला.