अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली.
काय म्हणाले गिरीश महाजन ?
“21 सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्य सरकारने त्यांच्या मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन अतिशय गंभीर आणि कटिबद्ध आहे.” असे गिरीश महाजन म्हणाले.
तसेच “धनगर समाजाची दुसरी मागणी अशी होती की, या आंदोलनाच्या काळात धनगर समाजाच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यात यावेत. तेही सरकारने मान्य केलं आहे. हे गुन्हे मागे घेण्यात येतील,” असेदेखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.