अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीतून (Amravati News) उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. या जागेवर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून प्रचंड संघर्ष होता. दोन्ही पक्षांना ही जागा स्वतःकडे हवी होती. मात्र ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवत या जागेवर नवनीत राणा यांना तिकीट दिलं. त्यामुळे नवनीत राणा या अधिकृतरित्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या या उमेदवारीमुळे शिंदे गटाचे निष्ठावान नेते आनंदराव अडसूळ हे प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रहार चे बच्चू कडू यांनी देखील राणांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध केल्यामुळे साहजिकच ते सुद्धा नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचा परिणाम राणांच्या मतांवर होऊ शकतो.
शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांना 2019 च्या निवडणुकांवेळी आनंदराव अडसूळ यांचा पराभव करण्यासाठी राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या नवनीत राणा यांचा कल भाजपकडे झुकला. तेव्हापासूनच त्यांनी भाजपला आणि भाजप पक्षाने राणांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिला. मात्र ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाते. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. आनंदराव अडसूळ यांचे नाव या सगळ्यात पुढे होते. मात्र नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता समोर आल्यापासून अडसूळ यांनी त्यांच्या नावाला प्रखर विरोध केला. नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांचे अमरावतीतील स्थानिक नेत्यांशी फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा नवनीत राणा यांना विरोध आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी देखील राणांना जाहीर रित्या विरोध केला.
राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास महायुतीतून प्रहार संघटना बाहेर पडू शकते, असे देखील ते म्हणाले होते. तरीदेखील आता राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू यांना मानणारा मतदार वर्ग नाराज झाला आहे. ही उमेदवारी जाहीर करताच बच्चू कडू म्हणाले ‘राणा यांनी अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका केली. तरीही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. भाजपने त्यांचे काम केले आता आम्ही आमचं काम करू, राणा यांचा प्रचार करणार नाही. भाजपला आमची गरज नाही त्यामुळे स्वबळावर लढण्याचा विचार करू. दुसऱ्याचे श्रेय लाटणे हे नवनीत राणांच्या विरोधात जाईल. आम्ही आमची नाराजी कुणापुढेही मांडणार नाही.’ त्याचबरोबर अमरावती लोकसभेच्या निकालातूनच आमची नाराजी दाखवून देऊ, असे आव्हानही बच्चू कडू यांनी भाजपला दिले आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे कार्यकर्तेही नाराज आहेत. आनंदराव अडसूळ यांनी तर ‘राणा यांना उमेदवारी देणं ही राजकीय आत्महत्या असून, राणांचा प्रचार कदापी करणार नाही.
राणा यांना शंभर टक्के पाडणार’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली असली तरीही भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत असा एक गट आहे ज्यांचा नवनीत राणांना विरोध असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. तर अमरावतीतील आदिवासींचे अनेक ज्वलंत प्रश्न आजही रखडलेले असल्यामुळे मोठ्या संख्येने सर्वसामान्यही राणांच्या कामाबद्दल समाधानी नाहीत. त्यामुळे नवनीत राणा यांना ही निवडणूक अतिशय जड जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आनंदराव अडसूळ हे बंडखोरी करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे कदाचित अडसूळ हे महायुतीला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडी बरोबर सुद्धा जाऊ शकतात. या जागेसाठी काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अडसूळ महाविकास आघाडी बरोबर गेल्यास त्यांचं अमरावतीतील बळ बघता त्यांनाच उमेदवारी मिळू शकते किंवा ते अपक्षही निवडणूक लढवू शकतात. पण असे झाल्यास अमरावतीमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळेल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट
Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?