नागपूर : सध्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात येणार आहे. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. अजित पवारांच्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली होती. काँग्रेस हा नेहमीच मोठा भाऊ राहिला आहे पण आम्ही कधी गर्व केला नाही असे नाना पटोले म्हणाले आहेत. तर तिघांची डीएनए टेस्ट करावी लागेल मग समजेल मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण ? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
लहान भाऊ मोठा भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही. प्रथम तिन्ही भाऊ मिळून शेती चांगली करून, उत्तम नांगरणी करू, पीक चांगल येईल यासाठी प्रयत्न करू. शेतीचा हंगाम चांगला करण्यासाठी चांगलं काम करू, पीक आल्यावर कशी वाटणी करायची हे ठरवू.. असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.