मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. आजही त्यांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जालन्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी यगोदरच जाहीर केले होते. तसेच संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही जालन्यात यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात यावं. मी उपोषण सोडेन. पण माझं आंदोलन सुरूच राहील, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हे नेते जालन्यात पोहोचणार आहेत.
मराठा आरक्षण प्रकरणी उपसमिती स्थापन
सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. यामुळे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन चंद्रकांत पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. चंद्रकांत पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.