जालना : जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणातील मुद्दे
17 व्या दिवशी मनोज जरांगेचे उपोषण मागे
लाठीचार्जची घटना अत्यंत दुर्दैवी
मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मुद्द्यावर तोडगा काढणार
रद्द झालेले आरक्षण पुन्हा देण्याची सरकारची भूमिका
कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार
मनोज जरांगेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेईल
जरांगेवर आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही
सरकारला अजून 10 दिवस वाढवून दिले
गेल्या 17 दिवसापासून संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत होतो..अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली, राज्यातील 19 बसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. बीड, जालना, नगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारचे शिष्टमंडळ तीनदा जीआर घेऊन मनोज जरांगे पाटलांकडे गेले. पण तीनही वेळा त्यांनी तो जीआर नाकारला. अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर आज 17 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातून सरबत पिऊन आपलं उपोषण सोडलं..मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी 10 दिवसांचा वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागे लागून मी आरक्षण घेणारच असंही ते म्हणाले.. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे.