गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोर्चा काढला होता. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अशा मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आले होते. अखेर आज मध्यरात्री मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या असून, उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. या सगळ्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
“तूर्तात असे वाटत आहे की मराठा समाजाचा विजय झाला. मराठा समाजाचा विजय झाला असे मला वाटत नाही. अशारितीने झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. समता परिषदेच्या माध्यमातून याचा विचार करु आणि योग्य कारवाई करु. हे सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर अजितबात टिकणार नाहीत असं माझे मत आहे. मराठा समाजाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की, ओबीसीच्या 17 टक्के आरक्षणात येण्यात तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटत आहेत. या 17 टक्क्यांमध्ये सगळे लोक येतील. इडब्ल्यूएसच्या आधारे तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळत होतं. ते यापुढे मिळणार नाही. खुल्या गटातील जे आरक्षण होतं ते सुद्धा आता मिळणार नाही. तुम्हाला 50 टक्क्यांमध्ये संधी होती. ती संधी गमावली. आता 374 जातींसाठी असलेल्या 17 टक्के आरक्षणासाठी तुम्हाला झगडावे लागेल. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही लागणार नाही म्हणत मागच्या दाराने तुम्ही प्रयत्न करत आहात. पण त्यामुळे 50 टक्क्यांची जी संधी होती ती तुम्ही गमावून बसलात,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
“आम्ही सर्व मंत्रिमंडळाने तशी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या एक अधिसूचना काढली आहे. याचं नंतर कायद्यात रुपांतर होईल. तत्पूर्वी 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी