भंडारा : दोन दिवसांपूर्वी पुण्याजवळील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता भंडाऱ्यामधून अशीच मधमाशांच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये स्मशानभूमीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरीकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. मोहाडी तालुक्यात येत असलेल्या हरदोली/झंझाळ या ठिकाणी ही घटना घडली आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला pic.twitter.com/secAdaN8t9
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) October 10, 2023
काय घडले नेमके?
गावातील मारोती कबल गायधणे (वय 69) यांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांसह गावातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमले होते. मृतदेहाला अग्निडाग देताच येथून निघालेला धूर वर झाडावर बसलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यापर्यंत पोहचला. यामुळे मधमाशा उडाल्या आणि त्यांनी नागरीकांवर हल्ला केला. यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. या मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोकांनी सैरावैरा धावायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी चिंचव्हाचे झाड असून आग्या मोहोळ या झाडावर बसले होते. सरणाचा धूर लागल्याने मधमांशानी हल्ला चढवला. मधमाशांनी हल्ला केल्याची ही भंडारा जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.