मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड (Sharad Pawar) करत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) मोठी फूट पडली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथपालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या बंडानंतर असे काही प्रश्न समोर आले आहेत ज्यावरून असे समजत आहे कि बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही ना? चला पाहूया यामागची कारणे…
1) दादांविरोधात न्यायालयात न जाणे
पक्ष फुटल्यानंतर दोनच तासांत पवारांनी पक्षाच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात जाणार नाही असे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत पवारांनी अजित पवारांना एकदाही दुषण दिलं नाही. बंडखोरी, पक्षफुटी, गद्दारी यातला एकही शब्द पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत उच्चारला नाही. पक्ष फुटल्यानंतर अनुभवी नेत्याचं शांत राहणं समजलं जाऊ शकतं पण कायदेशीर लढाईला थेट नकार देणे हे काही पटण्यासारखे नाही.
2) सुप्रिया सुळे, रोहित पवारांचीही सौम्य भाषा
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीसुद्धा या बंडानंतर सौम्य भूमिका घेतली आहे. दोघेही अजित पवारांच स्थान मान्य करत राहिले.
NCP News : अजित पवार आणि शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादी आली समोर
3) वर्षभराच्या मंत्रिपदासाठी ‘हे’ 3 नेते अजित पवारांसोबत का जातील?
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. हे तिन्ही नेते एका क्षणात अजित पवारांसोबत जातात हे काही पटण्यासारखे नाही आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यामागे तर ईडीही नव्हती मग फक्त वर्षभराच्या मंत्रीपदासाठी हे नेते दादांसोबत जातील. हे काही पटत नाही आहे.
4) एकमेकांना सांभाळण्याची धडपड?
एकीकडे अजित पवारांनी पक्षावर ताबा घेतोय असं दाखवलं. पण पक्षाध्यक्ष शरद पवारच राहतील हे स्पष्ट केलं. पवारांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष बदलले पण बॅनरवर पवारांचे फोटो ठेवले. दुसरीकडे कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळं फासलं. तर जितेंद्र आव्हाडांनी ते आपल्या हाताने पुसून काढले.
5) राष्ट्रवादीला वर्षभर आधीच भाजपसोबत जायचं होतं?
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्याची स्क्रिप्ट वर्षभर आधीच ठरली होती असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बंडालाराष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा आधीच सुरू झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेला दुजोरा दिला.
6) संघटनेतील बदल घटनेत नमूद न होणं
काही दिवसांपूर्वी पवारांनी संघटनात्मक नेमणूका केल्या. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं पण या सगळ्याची नोंद पक्षाच्या घटनेत केलीच नाही ती नंतर करू असं पवारांनी सांगितलंपण या बदलांनंतर फक्त दहा दिवसांत पक्ष फुटतो आणि या नेमणूका कागदावरच राहतात ही चूक म्हणायची की राजकीय खेळी?
या सगळ्या प्रश्नावरून असे लक्षात येते कि शरद पवारांचा (Sharad Pawar) या बंडाला पाठिंबा तर नाही ना? त्यामुळे आता राष्ट्रवादीला भविष्यात सरकारमध्ये काय स्थान मिळतं आणि 2024 च्या निवडणुकांना राष्ट्रवादी कशाप्रकारे सामोरे जाते यावर पक्षाची पुढील वाटचाल ठरणार आहे.