मुंबई : मराठा आंदोलनाचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा हायकोर्टात गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे येत्या काळात सदावर्ते विरुद्ध मराठा आंदोलक हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. जरांगे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे. तसेच आरक्षणासाठी सरकारला थोडा वेळ देण्यात यावा त्यासाठी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंतीही हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना करणार आहे.
यामुळे सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होते. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करतात का?, मनोज जरांगे आपले आंदोलन मागे घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची असणार आहे.