नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) उष्मघातामुळे (Heatstroke) एका 28 वर्षीय युवा शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याला उष्मघात आणि त्यानंतर हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विशाल रामराव मादसवार (Vishal Ramrao Madaswar) असे मृत पावलेल्या या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. तो हिमायतनगर शहरातील रहिवासी होता. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात उष्मघाताने बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
विशाल मादसवार हा शेताकडे गेला होता. भर उन्हात त्याने शेतीची कामे केली. दिवसभर शेतीची कामे आटोपून तो सायंकाळी 6 वाजता आपल्या घरी परतला. यानंतर त्याला घरी आल्यावर अत्यवस्थ वाटू लागले. त्याने ही गोष्ट घरच्यांना न सांगता तसाच झोपला. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत अचानक खालावली. यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्याला ह्रदयविकाराचा हलका झटका आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्न सोहळ्यावरुन परतताच विवाहितेचा मुत्यू
दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये देखील उष्मघातामुळे एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला होता. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33 वर्ष) असे या मृत महिलेचे नाव होते. घटनेच्या दिवशी रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवार, 11 मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत आपल्या घरी अमळनेर या ठिकाणी पोहोचल्या. यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना आपला जीव गमवावा लागला. रुपाली यांच्या माघारी पती, सासू सासरे, दीर असा परिवार आहे.