stock market : रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड दिसून आली. भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद ठरू शकला नाही. वास्तविक, कोविडच्या संकटातून सावरल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने एका मागून एक टप्पे गाठत उच्चांक प्रस्थापित केले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असणार्या निफ्टीने 18,600 ची पातळी गाठली; तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असणार्या सेन्सेक्सने 62,245 ही उच्चांकी पातळी गाठली होती.
मात्र ऑक्टोबर 2021 पासून बाजारात काहीशी घसरण ठळकपणाने जाणवण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला त्याकडे नफावसुली म्हणून पाहिले गेले; परंतु या घसरणीचे मुख्य कारण विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा हे होते. 2020 मध्ये कोविड महामारीनंतर गडगडलेल्या शेअर बाजारात अक्षरशः कवडीमोल दराने विदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची तुफान खरेदी केली. 2020 मध्ये 64,379 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती. याचे एक कारण म्हणजे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड पैसा ओतला होता. हा पैसा भारतासारख्या देशांच्या बाजारात आला.
परंतु 2021 मध्ये 92,729 कोटींचे समभाग विकले. ही विक्री प्रामुख्याने उत्तरार्धात सुरू झाली होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरातील बाजार गडगडल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसह बड्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे महागाईचा महाराक्षस मोठे आव्हान बनून उभा राहिल्यामुळे जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून महागाई नियंत्रणासाठी व्याजदरवाढीचे चक्र सुरू झाले. कोविड काळात ओतलेला पैसा काढून घेण्यास सुरुवात झाली. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा आणखी वाढला.
म्हणजे 2022 मध्ये जुलै अखेरीपर्यंत एफआयआयकडून तब्बल 2,91,019 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली आहे. साहजिकच यामुळे भारतीय शेअर बाजारात मध्यंतरीच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांचे, स्मॉलकॅप, मिडकॅप कंपन्यांचे समभाग हे 52 आठवड्यातील नीचांकी पातळीजवळ येऊन ठेपले. परिणामी निफ्टीने 15,183 च्या तर सेन्सेक्स 50,921 च्या पातळीवर आलेला पहायला मिळाला. खरे म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून तुफानी विक्री होऊनही भारतीय बाजारात फार मोठी घसरण झाली नाही. याचे कारण देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांकडून म्हणजेच डीआयआयकडून आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून घसरणीच्या काळात सातत्याने खरेदी होत राहिली.
उदाहरणच घ्यायचे झाल्यास 2021 मध्ये डीआयआयकडून 94,574 कोटींच्या समभागांची खरेदी झाली होती; तर 2022 मध्ये जुलै महिन्याखेरीपर्यंत 2,42,513 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीमुळेच 15,200 च्या पातळीवरुन जुलै महिन्यापर्यंत हळूहळू करत भारतीय शेअर बाजाराने मोठी मजल मारली. जवळपास 16,200 पर्यंत निफ्टी वधारला. यादरम्यान अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा एक धक्का देऊन झाला होता.