एटीएममुळे पैसे काढणे सोयीचे झाले असले तरी तांत्रिक चुकांचा फटका आपल्याला काही वेळा सहन करावा लागतो. अशावेळी एटीएममध्ये सजग राहणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याचा निपटारा कंटाळा न करता करणे तितकेच आवश्यक आहे. एटीएममधून पैसे काढताना खात्यातून पैसे कट झाल्याचा संदेश येतो, परंतु पैसे मशिनमधून येत नाही. अशी उदाहरणे आपल्याला सभोवताली पाहवयास मिळतात. एटीएममधून पैसे न आल्याने ग्राहक दोन्ही बाजूंनी अडकतो, एक तर गरजेच्या वेळी पैसे मिळत नाहीत आणि ते पैसे मिळवण्यासांठी बँकेत चकरा माराव्या लागतात.
असा प्रसंग आपल्यासमवेत घडल्यास हे करा
1. एटीएममधून पैसे न आल्यास ग्राहकांनी तक्रारीची तातडीने कार्यवाही करावी. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एटीएम मशिनमधून पैसे काढताना त्याची स्लिप काढणे महत्त्वाचे आहे. यातून एटीएममधून पैसे न आल्याचा पुरावा आपण ठामपणे मांडू शकतो. तरीही पीडित ग्राहकाला तक्रारीची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडणे गरजेचे आहे. ग्राहकाने तोंडी तक्रारीवर अवलंबून राहू नये. आरबीआयच्या नियमानुसार सर्व बँकांनी एटीएम परिसरात संपर्क अधिकार्यांचे फोन नंबर, नाव आणि हेल्पडेक्स नंबर आणि बँकेचे टोल फ्री नंबर सहजपणे उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. एटीएमच्या ठिकाणीच तक्रारीचे पुस्तक आणि तक्रारपेटी असणे देखील महत्त्वाचे आहे.
2. एटीएममधून आपण दहा हजारापासून ते एक लाखांपर्यंत पैसे काढू शकतो. एटीएममधून पैसे न आल्यास तक्रार दाखल झाल्यानंतर सात दिवसात पैसे परत करणे बँकांना बंधनकारक आहे. पण तरीही अनेकांच्या खात्यात हे पैसे जमा होत नाहीत. अशा वेळी तक्रार नोंदवणे गरजेचे असते.
तोंडी तक्रारीवर अवलंबून राहू नये
सर्वसाधारणपणे एटीएममधून रोकड न आल्यास पैसा आपोआप खात्यात जमा होतो. मात्र अनेकदा असे घडत नाही. काही वेळा आपण तासभर वाट पाहतो, नंतर चोवीस तास होतात, तरीही पैसे जमा होत नाही. अशावेळी तोंडी तक्रारीवर आपण अवलंबून राहू नये. नियमानुसार ग्राहकांना एटीएममधून पैसे न आल्यास तीस दिवसाच्या आत तक्रार करणे गरजेचे आहे आणि तक्रारीनंतर सात दिवसात पैसे परत करणे बंधनकारक आहे. जर बँक वेळेवर पैसा देत नसेल तर पीडित त्या रक्कमेवर व्याज मिळवण्यास देखील पात्र आहे.
तक्रारीची प्रक्रिया
एटीएममधून पैसे न आल्यास त्याची स्लिप सांभाळून ठेवा. या स्लिपवर एटीएमचा आयडी क्रमांक, लोकेशन आणि पैसा काढण्याची वेळ, दिनांक याचा समावेश असतो. आपण थेट बँकेच्या शाखेत जावून यासंदर्भात तक्रार करू शकतो.
1. स्लिप आली नाही तर बँकेच्या स्टेटमेंटची झेरॉक्स कॉपी लावणे गरजेचे आहे. ज्या बँकेचे आपले खाते आहे, त्या बँकेशी संपर्क साधावा. बँकेच्या टोल फ्रि क्रमांकवर फोन करून किंवा ऑइलाइनवर तक्रार नोंदवू शकतो. आपल्याला तक्रारीचा क्रमांकही मिळतो. भविष्यात संदर्भासाठी तो क्रमांक महत्त्वाचा असतो.
2. तक्रार दाखल केल्यानंतर बँकेकडून कॉल येऊ शकतो. साधारणपणे सात दिवसात खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित असते. सात दिवस लोटल्यास बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधा. त्याच्याकडूनही निराकरण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे तक्रार करा.
3. आरबीआयकडे तक्रार करण्याचा देखील पर्याय असतो. जर सर्वच प्रयत्नात अपयश आले तर ग्राहक मंचाकडे देखील जावू शकतो. यादरम्यान नुकसान भरपाई देखील मिळू शकते.