तुम्हीं गर्दीत असता आणि अचानक पाकिट चोरीला जातं. तुम्हाला टेन्शन येतं. पण पैसे चोरीला गेल्यापेक्षाही तुम्हाला टेन्शन येतं ते त्यातली कार्ड्स, कागदपत्रे आणि माहिती हरवल्याचं. कारण हल्ली आपल्या पाकिटांमध्ये पैशांपेक्षा क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स जास्त असतात. त्या गोष्टी हरवल्यानं त्या पुन्हा मिळवण्याचा त्रास आणि त्यांच्यापासून होणार्या नुकसानीचा त्रास मोठा असतो. घरातल्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांचंही तसंच. ती चोरीला गेली, गायब झाली किंवा हरवली तर…?
पूर, भूकंप या आणि अशा आपत्ती आपल्या जनजीवनावर मोठा परिणाम करतात. जे आपल्या जवळ असतं, ते तर हिरावलं जातंच, पण आपण गुंतवणूक म्हणून किंवा भविष्याची काळजी म्हणून बँकांमध्ये जे काही ठेवलेलं असतं, त्याचे पुरावेच अर्थात कागदपत्रंच आपल्याकडे नसल्यानं त्यावर अक्षरश: पाणी पडतं. त्यातलं किती मिळेल, सांगता येत नाही. बर्याचदा मिळतच नाही. आता इलेक्ट्रॉनिक यंत्रणांमुळे, मेल बॅकअपमुळे ते मिळवणं शक्य होईलही. मात्र, त्याची काळजी कशी घ्यायची, अशी आपत्ती आल्यानंतर काय करावं… यासाठी हा सल्ला.
म्युच्युअल फंडाबाबतची पत्रे
या गुंतवणुकीतील कागदपत्रांत हल्ली बरेच जण इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असल्यानं मेलवरच त्याचं प्रमाणपत्र पाहतात आणि डुप्लिकेटवरच समाधान मानतात. पण म्युच्युअल फंड काढताना त्याच्या अर्जात मेल बॅकअप व्यवस्था असते. त्याचा पर्याय निवडला, तर तुम्हाला मूळ कागदपत्रं घरपोच तर मिळतेच, शिवाय तुमच्या मेलवरही त्याची स्कॅनकॉपी मिळते. त्यामुळे हे कागद हरवले, तरी तुम्ही मेलवरून त्याचे डिटेल्स पुन्हा त्या कंपनीला कस्टमर केअर नंबरवर कळवून नवी कॉपी मागवू शकता. खरं तर मेल बॅकअप नसला, तरीही तुमची गुंतवणूक सुरक्षितच असते. फक्त तुमच्या काही चाचण्या घेऊन तुम्हाला पुन्हा कागदपत्रे दिली जातात, असं फंड्स इंडिया डॉट कॉमचे सीओओ श्रीकांत मीनाक्षी यांचं म्हणणं आहे.
लाइफ इन्शुरन्स योजना
या योजनांतली कागदपत्रं गहाळ झाली, तर तुम्हाला तुमच्या एजंटला किंवा थेट त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन एका अर्जावर तसं डिक्लेरेशन द्यावं लागतं. त्यानंतर ते तुमच्या गुंतवणुकीचं स्टेटस तपासून तुम्हाला डुप्लिकेट पॉलिसी देतात. कोणत्या कारणाने ते गहाळ झालंय, याचं कारण मात्र द्यावं लागतं. त्यानंतर सात दिवसांत तुम्हाला पुन्हा कागदपत्रं देणं त्या कंपनीवर बंधनकारक आहे.
घराची नोंदणी किंवा इतर कर्जांची कागदपत्रं
ही कागदपत्रं गहाळ झाल्यानंतर तुम्हाला सर्वांत आधी पोलिस स्टेशनला तक्रार करावी लागते. त्यानंतर वृत्तपत्रांत माहिती द्यावी लागेल. पोलिस स्टेशनमधील एफआयआरची कॉपी घेऊन जिथे तुम्ही घराची नोंदणी केली असेल, तिथे जावे लागेल. तिथे अर्ज केल्यानंतर तुम्हाला घराच्या नोंदणीची डुप्लिकेट कागदपत्रं मिळतील. कर्जांच्या कागदपत्रांबाबतही तुम्हाला आधी तक्रार करावी लागेल, त्यानंतर त्याची एफआयआर कॉपी घेऊन संबंधित बँकेत जावं लागेल. त्यानंतर त्या बँकेच्या नियमांनुसार रितसर प्रक्रिया होईल.
या सर्व कटकटींपासून वाचण्यासाठी क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्ससह तुमची सर्व कागदपत्रं स्कॅन करा आणि मेल बॉक्समध्ये सेव्ह करा. ज्यामुळे ती हरवल्यास मिळवताना होणारा त्रास आणि मनस्ताप वाचेल.