चहा म्हणजे भारतीय लोकांचे सर्वात आवडीचे पेय …. खूप कमी लोक असे आहेत ज्यांना चहा आवडत नाही किंवा चहा ऐवजी ते कॉफी पिणं जास्त पसंत करतात. पण तरीही चहाप्रेमीच भारतामध्ये तुम्हाला जास्त सापडतील. पण प्रत्येक पदार्थाचा जसा शरीराला उपयोग होत असतो, तसाच कुठेतरी दुष्परिणाम देखील शरीराला भोगावा लागत असतो. अर्थात त्या कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन किंवा व्यसन हे वाईटच …
चहा प्रेमींचे सुद्धा प्रकार आहेत. काही जणांना सकाळी उठल्या उठल्या आधी चहाच लागतो. काही जणांना दिवसातून दोन वेळा तरी चहा लागतो. तर काहीजण असेही आहेत ,की जे दिवसभरातून अनेक वेळा तल्लफ होते म्हणून चहा पीत असतात. पण कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे शरीरासाठी घातकच. तर आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, चहाच्या अति सेवनामुळे शरीराला नक्की काय परिणाम भोगावे लागतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही लोक हे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असाच चहा पितात… चहाने तरतरी येते हे नक्की पण लक्षात ठेवा सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी चहा घेऊ नका. कमीत कमी त्या चहासोबत एखादी पोळी ,टोस्ट ,बिस्किट तरी आवर्जून खा. त्याहूनही चांगले म्हणजे सकाळी आधी भरपेट नाश्ता कराच.
उपाशीपोटी चहा प्यायल्याने मोठ्या प्रमाणावर ऍसिडिटी होण्याची समस्या वाढू लागते.
सातत्याने चहा पिणाऱ्यांसाठी चहा हा खूप घातक ठरू शकतो ,यामुळे पोटासंबंधीचे मोठे आजार, हृदय विकार ,अनिद्रा असे आजार संभवू शकतात.
जेवणानंतर जे लोक चहा पितात त्यांच्या शरीरामध्ये आयर्नची कमी भासू लागते. शरीराला जर आयर्नची कमी भासू लागली तर ऍनिमिया, सातत्याने थकवा येणे असे आजार संभवतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने चहा प्यायल्याने लठ्ठपणा ,शुगर ,हाय बीपी ,उष्णतेचे आजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात.
त्यामुळे जर तुम्ही अति प्रमाणावर चहा पीत असाल तर स्वतःच्या शरीरासाठीच मनावर नियंत्रण मिळवा. शरीराला तरतरी येण्यासाठी चहा पीत असाल तर शरीराला मरगळ आणणारा देखील चहाच आहे ही गोष्ट देखील लक्षात घ्या.