मुंबई- राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
चार दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरु करण्या संधर्भात माहिती दिली होती. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पहिली ते बारावी आणि शिशू वर्ग सुरू करण्यासही मान्यता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, युरोपात कोरोनाची लाट सुरु असताना शाळा सुरु आहेत. राज्यभरातील रुग्णालयात ९० ते ९५ टक्के बेड रिकामे असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरु केल्या सल्ल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे असं आवाहन त्यांनी केलं. जालनामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्या जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या जास्त असेल अशा जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने या संबंधीचा निर्णय घ्यायचा आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचना केल्या असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.