यवतमाळ : राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यामुळे काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी घरात शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात (Yawatmal News) वाघाडी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. वाघाडी गावात पहाटे पावसाचे पाणी शिरले. यावेळी घराची भिंत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे नदी नाल्याला पूर आल्याने पाणी गावात शिरले. यवतमाळ शहराला (Yawatmal News) लागून असलेल्या वाघाडी गावात पहाटे दरम्यान पावसाचे पाणी शिरले. काही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. गावातील काही धाडसी युवकांनी धाव घेत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. रात्री उशिरा पर्यंत बचाव पथकाचे कुणीही न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या मुसळधार पावसामुळे वाघाडी गावातील 50 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. यवतमाळमधील (Yawatmal News) काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.