यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून महिलेने आपल्या दोन लेकरांसह विष प्राशन करुन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर या ठिकाणी सोमवारी सायंकाळी घडली आहे. रेशमा नितीन मुडे (वय 27), श्रावणी नितीन मुडे (वय 6) आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे (वय 4) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन किसन मुडे (वय 28) आणि सासरा किसन हेमाला मुडे (वय 55) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
काय घडले नेमके?
महागाव तालुक्यातील धानमुख येथील वसंत टीकाराम राठोड यांच्या मुलीचा विवाह नितीन मुडे यांच्याबरोबर झाला होता. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरु होतं. त्यांना दोन मुले झाली. पण, नंतर नितीनला दारूचे व्यसन लागले आणि तिकडून त्यांच्या संसाराला ग्रहण लागले. त्याने माहेरवरून पैसे आणण्यासाठी रेशमाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. उपाशी ठेवणे आणि शिवीगाळ करत मारहाण करणे अशा पद्धतीने त्याने त्रास द्यायला सुरूवात केली. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रेशमा गप्पपणे हा सगळा त्रास सहन करत होती.
घटनेच्या दिवशी नितीनचा आणि तिचा वाद झाला. त्यानंतर दुपारी रेशमाने आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले आणि स्वत:ही विष प्राशन केले. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना सवना येथे शासकीय रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी रेशमा आणि श्रावणी या मायलेकींचा मृत्यू झाला. मुलगा गंभीर असल्याने त्याला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचाही काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेशमाच्या वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी रेशमाचे वडील वसंत राठोड यांनी बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.