वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत पसरविणाऱ्या 30 वर्षीय गुंडाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या गुंडाची गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून हत्या केली आहे. ही थरारक घटना हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) या ठिकाणी बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून इतर गावकऱ्यांचा शोध सुरू आहे.
काय घडले नेमके?
आकाश उल्हास उईके (30) असे हत्या करण्यात आलेल्या गुंडांचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चोरी, गुंडगिरी करून दशहत निर्माण केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात कारागृहात असताना चार दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता. यानंतर त्याने गावात येऊन लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. बुधवारी रात्री साडेदहा वाजतादरम्यान अवैध दारूविक्रेत्याकडे दारू मागण्यासाठी गेला. दारू न मिळाल्याने गावातील काही लोकांना त्रास देऊ लागला. एका युवकाची मोटारसायकल पाडली. वाद घालतच ग्रामपंचायतीसमोरील चौकात पोहोचला. तिथे असलेल्या जमावाशीही वाद घालू लागला.
त्याच्या या त्रासाला वैतागून अखेर गावकऱ्यांनी त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वर्धा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.