यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी वणी शहरापासून जवळ असलेल्या वांजरी या ठिकाणी घडली. रविवारी सकाळी तिघांचेही मृतदेह मिळाले. आसिम अब्दुल सत्तार शेख (वय 16), नुमान शेख सादिक शेख (वय 16) दोघे रा. एकतानगर, वणी व प्रतीक संजय मडावी ( वय 16) रा. प्रगतीनगर, वणी अशी मृत तरुणांची नावे आहेत.
काय घडले नेमके?
या तिघांना सुट्टीच्या दिवशी दुचाकीने निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाणे. मोबाइलने फोटो काढणे असा त्यांना छंद होता. शनिवारी तिघेही मोपेड क्र. एमएच 29 वाय 5342 ने वणीजवळ असलेल्या वांजरी येथे गेले. पूर्वी या परिसरात चुनखडीच्या खाणी होत्या. त्यामुळे त्या जागेवर झालेल्या विस्तीर्ण खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप आले होते.
हा खड्डा 60 फूट खोल असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्याठिकाणी सेल्फी काढल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला. यानंतर हे तिघेही तलावातील पाण्यात उतरले. यादरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे या तिघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.