ठाणे : 27 मे रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीमध्ये बांधून सेलो टेपच्या सहाय्याने गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेच्या खुनाच्या मागे दुसरा कोणाचा हाथ नसून तिच्या पतीचाच हाथ आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
काय घडले होते नेमके?
ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीत बांधून सेलो टेपच्या सहाय्याने गुंडाळून फेकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाचा दुर्गंध पसरू लागल्याने स्थानिकांनी मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी 3 पथके नेमली होती.
या तीन पथकातील एका पथकाने आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील मिसिंगच्या तक्रारी तपासल्या तर दुसऱ्या पथकाने घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीचा शोध घेतला. यामध्ये सीसीटीव्हीमध्ये एक टेम्पो संशयास्पद असल्याचे पोलिसांना आढळून आले. या टेम्पोचा नंबर दिसून न आल्याने टेम्पोच्या दिशेने पोलिसांनी जवळपास 20 ते 22 सीसीटीव्ही तपासून शोध घेत मुंबईच्या अंधेरीत पोहचले. पोलिसांनी तपास केला असता मयत महिलेचे नाव मुन्नी नवाब शेख असल्याचे पोलिसांना कळले. तसेच नवाब शेख आणि मुन्नी शेख हे दोघे पती पत्नी असून 24 तारखेपासून ते दोघेही बेपत्ता असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांना तिच्या पतीवर संशय आला. यानंतर या महिलेच्या पतीचा तपास केला असता तो पश्चिम बंगाल येथे पळून समजले.
यानंतर पोलिसांनी या आरोपी पतीचा शोध घेण्यसाठी पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद या ठिकाणी एक पथक रवाना केले. मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने तपास करून तब्बल दोन जिल्ह्यांमध्ये 8 दिवस कसोशीने तपास करून तांत्रिक यंत्रणांच्या सहाय्याने आणि आपल्या गुप्तहेरांच्या साहाय्याने आरोपी नवाब शेखला 7 जून रोजी अटक केली. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.