ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात (Kalwa Hospital) 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचादेखील समावेश आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. आता सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय (Kalwa Hospital) गेल्या दोन महिन्यांपासून नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे. अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मनसे आक्रमक
कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका भवनात शिरून आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला. कळवा रुग्णालयात झालेल्या 18 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा जाब यावेळी विचारण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली….प्रशासनाला धारेवर धरत आयुक्तांनी या घटनेची जबाबदारी घेतलीच पाहिजे अशी मनसे कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का? असा प्रश्न ठाण्याच्या नागरिकांकडून विचारला जात आहे.