पाटणा- एका युवतीचं एका तरुणावर प्रेम जडलं. तरुणीने आपलं प्रेम व्यक्त करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणाने लग्नास नकार दिला. यामुळे निराश झालेल्या तरुणीने घरी येऊन विषारी पदार्थ खाल्ला. जेव्हा या तरुणीच्या पाच मैत्रिणी घरी पोहोचल्या तेव्हा तरुणीची ही अवस्था पाहून त्यांनीही विष प्राशन केलं. या घटनेत तीन तरुणींचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमधील एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मैत्रिणींसमोर आपलं प्रेम व्यक्त करत त्याला लग्नासाठी विचारणा केली, मात्र त्याने लग्नास नकार दिला. प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर सगळ्या मैत्रिणी गावी आल्या. नंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या मैत्रिणीने विष प्राशन केलं आहे. हे पाहून इतर मैत्रिणींनीही तिची साथ दिली आणि या सगळ्यांनी विष प्राशन केलं.
औरंगाबाद जिल्ह्यातील कसमा पोलीस स्टेशन हद्दीतील चिरैला गावात हा भयानक प्रकार घडला. या घटनेत ३ जणींचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सगळ्या मैत्रिणी गुरारू येथे गेल्या होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं. तीन मुलींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.