सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur News) पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वाद विकोपाला गेल्याने पतीने अगोदर पत्नीला विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना (Solapur News) मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) या ठिकाणी घडली आहे. या घटनेमध्ये सिद्धाराम सुभाष कारंडे (वय-28) आणि सोनाली सिद्धाराम कारंडे (वय 25, रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. लक्ष्मण बाबू आलदर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
काय घडले नेमके?
सिद्धाराम कारंडे याने पत्नी सोनाली कारंडेला विहिरीत ढकलून दिले. जेव्हा सोनाली जीव वाचवण्यासाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर पती सिद्धाराम याने स्वतः विहिरीत उडी मारून तिला बुडविले आणि मग तो स्वतःही बुडाला. या घटनेने सांगोला तालुक्यात (Solapur News) आणि सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली आणि त्याच्या आजीसह राहत होता. सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. 13 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोनाली कारंडे ही त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिद्धाराम हाही गेला. त्यावेळेस सिद्धराम कारंडेने मोठ्या प्रमाणात दारू पिली होती.
यादरम्यान पती – पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. हा वाद पुढे विकोपाला गेल्याने सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. फिर्यादी लक्ष्मण आलदर हा पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सोनाली या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि आपल्या पत्नीचे पाय ओढून तिला विहिरीतील पाण्यात खेचले. या घटनेत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे फिर्यादीलाही वर येता येत नव्हते. सायंकाळी सातच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी लक्ष्मण आलदर यांनी विहिरीतून आवाज दिला. आवाजावरून लोकांनी फिर्यादीस आणि पती – पत्नीचे प्रेतं विहिरीबाहेर काढले. सांगोला पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.