सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या एका कुटुंबाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील (Karnatak) हास्पेटजवळ हा अपघात झाला आहे. मृत व्यक्ती हे सगळेजण एकाच कुटुंबातील होते. राघवेंद्र सुभाष कांबळे (वय 25)(Raghavendra Subhash Kamble), त्यांच्या पत्नी जानू राघवेंद्र कांबळे (वय 23)(Janu Raghavendra Kamble) , त्यांची मुले राकेश (वय 5) आणि रश्मिका (वय 2) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.या अपघातात या कुटुंबासह आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.
काय घडले नेमके?
मृत राघवेंद्र कांबळे हे मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावचे राहणारे होते. बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत ते नोकरीस होते. पत्नी व मुलांसह ते बंगळुरूत राहात होते. दरवर्षांप्रमाणे लवंगी गावात यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी कांबळे हे कुटुंबीयांसह 15 दिवसांपूर्वी आले होते. यात्रा संपल्यानंतर ते कुटुंबीयांना घेऊन खासगी मोटारीने बंगळुरूला परत निघाले होते.
यादरम्यान कर्नाटकातील हास्पेटजवळ समोरून भरधाव येणाऱ्या मालमोटारीने कांबळे यांच्या मोटारीला जोरात धडक दिली आणि हा अपघात झाला. या अपघातात कांबळे दाम्पत्यासह त्यांची दोन्ही मुले आणि नातेवाईक अशा 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लवंगी गावात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली.