अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या (Akola Crime) अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीविरोधातील कलमांमध्ये वाढ करून त्यामध्ये 302 सह 376, 377 कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काजल ही 27 जुलैपासून बेपत्ता होती आणि 29 जुलै रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
काजल ही 27 जुलै रोजी रात्री शौचालयास जाते म्हणून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. पातुर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. परंतु 29 जुलै रोजी पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात काजलचा मृतदेह आढळून आला. काजलचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. आधी गळा आवळला आणि नंतर तिचे हात बांधून ठेवले, असं प्राथिमक वैद्यकीय अहवालात समोर आलं होतं.
या घटनेमुळे (Akola Crime) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पातुर पोलिसांना गावातीलच गजानन बळकर याचे काजलच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हे प्रकरण एवढे चिघळले कि याचे परिणाम विधानभवनात उमटले होते.
आमदार अमोल मिटकरींचा आरोप
तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून कुटुंबियांना सहकार्य मिळालं नाही, याअगोदर तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्यांनं दखल घेतली नाही, त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणानं काजलचा बळी गेला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता.