सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यातील पाडळी – हेळगाव (Padli – Helgaon) या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलींसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रागिणी रामचंद्र खडतरे (वय 4) (Ragini Ramachandra Khatare), वैष्णवी गणेश खडतरे (वय 15)(Vaishnavi Ganesha Khatare), शोभा नितीन घोडके (वय 32) (Shobha Nitin Ghodke) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.
काय घडले नेमके?
कराड तालुक्यातील पाडळी – हेळगाव येथे माणिक पाटील यांच्या मालकीच्या शेततळ्यात एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होते. मूळचे कराडच्या खराडे कॉलनीतील असलेले हे कुटुंब पाटील यांच्याकडे कामानिमित्त राहत होते.
पाडळी येथील शेततळ्यात त्याच परिसरात काम करणारे मजूर दररोज पोहण्यासाठी जात होते. यामध्ये लहान मुलांसह महिला तसेच पुरुषही सहभागी होत होते. आज नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी सर्व जण शेततळ्यात उतरले. ज्यांना पोहण्यास येत नव्हते त्यांच्या मदतीला तळ्यात दोऱ्या बांधल्या होत्या. पोहण्यास न येणारे या दोरीला धरुन तळ्यात उतरले यादरम्यान या तिघांच्या अतिभाराने अचानक ती दोरी तुटली आणि ते पाण्यात बुडू लागले. यानंतर बाकीच्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तिघींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.