सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करून पती-पत्नीची हत्या केली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात घडली आहे. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार अशी मृत पती-पत्नीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पवार पती- पत्नी गावातील पवार दरा येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विद्युत पंप सुरु करण्यासाठी आले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळी अज्ञाताने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गळ्यावर सपासप वार करून त्यांनी हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह आढळून आले.
शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांची नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.