रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील (Ratnagiri News) भोस्ते घाटातील धोकादायक अवघड वळण हे अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या अवघड वळणावर आजवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. आठवड्यातून जवळपास चार ते पाच अपघात या ठिकाणी घडत असतात. याच अवघड वळणावर ट्रक आणि दुचाकीचाच्या झालेल्या भीषण अपघातात एका 26 वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. शुभम सुदाम काणेकर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो एक इंटिरिअर डेकोरेटर होता.
कसा घडला अपघात?
शुभम काणेकर हा आपल्या दुचाकीने मोरवंडे येथे जात असताना भोस्ते घाटाच्या अवघड वळणावर पुढे असलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीस्वार काणेकर गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ खेड भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सांयकाळी त्याची प्राणज्योत मालवली. शुभम याच्या मृत्यूने काणेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला अटक करण्यात येत नाही आणि ट्रक मालक समोर उपस्थित होत नाही, तसंच काणेकर कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी श्री मनोगेकर आणि पोलीस निरीक्षक श्री भोयर यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी नरमाईची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अपघातग्रस्त ट्रक जप्त केला आणि ट्रकचालक अंगद मरजाद सिंहला अटक केली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.