पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघसडकीस आली आहे. यामध्ये एका 70 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अनेकदा क्षुल्लक कारणांवरून झालेले वाद भलतेच विकोपाला जातात. या प्रकरणातदेखील असेच घडले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत ज्ञानेश्वर साळुंखे (70) हे नवी खडकी येथील रहिवासी आहेत. यांनी क्षुल्लक वादातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. नवी खडकी भागात ही घटना घडली आहे. साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकर लावल्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होत आहे अशी विनंती केली.
यानंतर आरोपींनी त्यांचा अपमान करून त्या ठिकाणाहून हाकलून दिले. यामुळे अपमानित झाल्याच्या भावनेतून ज्ञानेश्वर साळुंखे यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रकरणी पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (26), देवेश ऊर्फ नन्या पवार (18), यश मोहिते (19), शाहरुख खान (26), जय तानाजी भडकुंभे (22) यांना अटक करण्यात आली आहे.