मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा दबाव होता असा धक्कादायक खुलासा ईडी समोर दिलेल्या जबाबामध्ये केला आहे. परमबीर सिंग यांच्या खुलाशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.
या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती असेही परमबीर यांनी ‘ईडी’ला सांगितले.