नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील (Navi Mumbai News) कासारभाट गावातील प्रियांका तांडेल या 20 वर्षीय तरुणीला मोबाईल जास्त वापरते म्हणून घरचे ओरडले होते. याचा राग आल्याने प्रियांका 23 ऑगस्ट रोजी भर दुपारी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली. मात्र आता 7 दिवसांनी तिचा मृतदेह समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पात्रामध्ये आढळून आला.
रात्रीच्या वेळी मच्छीमारी करताना एका मच्छीमाराला कुणा एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यानंतर त्याने जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्यात फोन करून सदर प्रकरणाची माहिती दिली. याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित गोळे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला.यानंतर मृतदेहाच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवण्यात आली.
यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता तरुणीचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रागाच्या भरात प्रियांकाने स्वत:चं आयुष्य संपवलं की तिच्यासोबत काही घातपात झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.