नवी मुंबई : नवी मुंबईमधील (Navi Mumbai News) पनवेल या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काय घडले नेमके?
पनवेल येथून नवी मुंबईच्या दिशेने येत असलेल्या भरधाव होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात कार चालक तरुणाचा आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पनवेल येथील टी-पाँईटजवळ घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. चैतन्य सुरेश फडाळे (वय 25) आणि दृष्टी देवेंद्र खाडे (वय 24) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुण तरुणीचे नाव आहे. चैतन्य हा सानपाडा सेक्टर-4 मधील ड्रीमलँड सोसायटीत राहत होता. तसेच तो सिव्हील इंजिनियर होता. तर दृष्टी खाडे हि कांजुरमार्ग येथील एनसीएच कॉलनी येथे राहण्यास होती.
चैतन्य आणि दृष्टी हे दोघेही मित्र असल्याने सोमवारी सांयकाळी हे दोघेही एकत्र भेटले होते. त्यानंतर चैतन्य आणि दृष्टी हे दोघेही होंडा सिटी कारने पनवेलमध्ये गेले होते. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हे दोघेही पनवेल येथून जेएनपीटी रोडने उलवे मार्गे नवी मुंबईत येत होते. यावेळी त्यांची कार पनवेल येथील टी-पाँईटजवळ आली असताना भरधाव वेगात असलेल्या कारवरील चैतन्यचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या भीषण अपघातात चैतन्य आणि दृष्टी दोघेही जागीच ठार झाले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवून दिले आहेत. पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.