पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९), सारिका रेनुकेश जाधव (वय २३) अशी मृत्यू झालेल्या जोडप्याची व ईश्वरी संदेश देशमुख, असे मुलीचे नाव आहे. हे तिघेही शुक्रवारी सायंकाळी सासवडहून परिंचेकडे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रस्त्याशेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड जाधव यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची गंभीर जखमी झाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही रात्री उशिरा मृत्यू झाला.