नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात पुन्हा एकदा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय 27 वर्ष, राहणार न्यायडोंगरी) असे मृत महिलेचे नाव आहे. भाग्यश्रीचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून झाल्याचा आरोप मृत भाग्यश्री यांचा भाऊ सचिन कैलास साळुंखे (रा. वाळुंज, छत्रपती संभाजीनगर) याने केला आहे. या प्रकरणी त्याने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर हा गुन्हा नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता. परंतु तब्बल 15 दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन साळुंखे याने नांदगाव पोलीस ठाण्यात बहीण भाग्यश्री हिचा खून झाल्याची फिर्याद दाखल केली.
त्याने आपल्या तक्रारीत म्हंटले कि, माझी बहीण भाग्यश्री हिच्याकडे पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व तिचे सासरे नंदू राघो शेवाळे हे नेहमी ‘तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन ये’ अशी मागणी वेळोवेळी करीत होते. परंतु त्यांची मागणी भाग्यश्री हिच्याकडून पूर्ण न झाल्याने केवळ पंचवीस लाख रुपयांसाठी आरोपी डॉ किशोर नंदू शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने बहीण डॉक्टर भाग्यश्रीला हिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून ठार केले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत असून यामध्ये काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.