नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा येथील धरणात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
काय घडले नेमके?
नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात 14 वर्षीय इयत्ता सातवीत शिकणारा आर्यन गोरख वळवी आणि चौथीत शिकणारा 12 वर्षीय प्रीतम गोरख वळवी हे दोघे सख्खे भाऊ फिरण्यासाठी त्यांच्या शेतालगत धरणात गेले होते. धरणाच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
आपल्या दोन्ही मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. बर्डीपाडा येथील दोन सख्ख्या भावांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघे सख्ख्या भावांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांडबारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.