नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मांजराच्या चाव्याने मृत्यू कसा होऊ शकतो ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. आपल्या तरुण मुलाच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद केली आहे.
काय घडले नेमके?
हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका 11 वर्षीय तरुणाचा मित्रांसोबत खेळताना मांजर चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो काही मित्रांसोबत खेळत होता.यावेळी मांजराने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या पायाचा चावा घेतला असे त्याच्या आईला सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या. यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्याचे आई वडील श्रेयांशुला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला. हिंगणा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकेल. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा